Friday, July 20, 2012

कृषी शिक्षणातील संधी

कृषीच्या उत्पादन वाढीमध्ये कृषी शिक्षणाचा व संशोधनाचा मोठा वाटा आहे. भारतात मध्ययुगीन काळापासून कृषी शिक्षणाचे महत्त्व दिसून येते. नालंदा व तक्षशिला विद्यापीठात कला अभ्यासाबरोबर कृषी अभ्यासक्रमाचा देखील समावेश होता. आधुनिक कृषी शास्त्राचा सुसूत्र अभ्यासक्रम सन 1905 मध्ये कानपूर, लॉयलपूर, कोइमतूर आणि नागपूर येथे कृषी महाविद्यालय स्थापन होऊन सुरवात झाली. त्यानंतर सन 1906 मध्ये पुणे येथे कृषी महाविद्यालयाची स्थापन होऊन सुरवात झाली. देशामध्ये सन 1960 मध्ये पंतनगर येथे जी. बी. पंत कृषी विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने उच्च कृषी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सध्या भारतामध्ये एकूण 53 कृषी विद्यापीठे, पाच अभिमत विद्यापीठे, एक केंद्रीय कृषी विद्यापीठ व चार केंद्रीय विद्यापीठे कार्यरत आहेत. या सर्व विद्यापीठांमधून कृषी क्षेत्रासाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविले जाते. 

महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठामध्ये घटक व विनाअनुदानित महाविद्यालयांमधून कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, गृह विज्ञान, मत्स्य विज्ञान आणि वनिकी या शाखांचा पदवी अभ्यासक्रम राबविला जातो. या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी किमान 12 वी विज्ञान उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे प्रवेश दिला जातो. प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद पुणे यांच्यामार्फत राबविली जाते. सन 2008-09 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र ज्ञान आयोग मर्यादित यांचे सहकार्याने प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज उपलब्ध आणि अर्ज भरून देण्याची सुविधा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र ज्ञान आयोगाच्या संकेतस्थळावर आणि त्यांचे तालुका पातळीपर्यंत असणाऱ्या केंद्रामधून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

सध्या काळाची गरज विचारात घेता जास्तीत जास्त प्रात्यक्षिकांवर भर असलेला कार्यानुभवाधिष्ठित अभ्यासक्रम चौथ्या अखिल भारतीय अधिष्ठाता समितीने शिफारस केल्यानुसार सन 2007-08 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठामध्ये सुरू करण्यात आला आहे. या सुधारित अभ्यासक्रमानुसार बी.एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सातव्या सत्रात ग्रामीण कृषी कार्यानुभवावर आधारित कृषी पूरक उद्योगामध्ये कृषी शिक्षण आणि आठव्या सत्रामध्ये कार्यानुभवाधिष्ठित व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाचे कृषी शिक्षण दिले जात आहे. यामुळे कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होईल. बी.एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आठही शाखांच्या कृषी संलग्न पदवीधारकांना सातव्या सत्रात संपर्क शेतकरी आणि कृषी पूरक कारखानदारीमध्ये कार्यानुभव प्रशिक्षण आणि आठव्या सत्रामध्ये कार्यानुभव आधारित व्यावसायिक कृषी शिक्षण दिले जात आहे. उद्यान विद्या, गृहविज्ञान, अन्न तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी या पदवीधारकांना कृषिपूरक उद्योगामध्ये जास्त दिवस कार्यानुभव कृषी शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे या पुढील काळात कृषी आणि कृषी संलग्न पदवीधारकामध्ये आत्मविश्‍वास निर्माण होऊन स्वयंरोजगार वाढण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. तसेच या सर्व प्रयत्नामुळे कृषी विद्यापीठांना व्यावसायिक पदवीधर निर्माण करणे शक्‍य आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रम  
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये एम.एस्सी. (कृषी), एम.टेक. (कृषी अभियांत्रिकी), एम.एस्सी. (कृषी जैवतंत्रज्ञान) हे दोन वर्षांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच तीन वर्षांचा आचार्य पदवी अभ्यासक्रम राबविले जातात. याशिवाय एम.टेक. (अन्नशास्त्र) आणि एम.एस्सी. (गृहविज्ञान) हे पदव्युत्तर अभ्यासक्रम मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे तर एम.एस्सी. (कृषी हवामान शास्त्र) अभ्यासक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथे व मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय, लातूर येथे राबविण्यात येत आहे. मत्स्य विज्ञान या विषयाचा एम.एस्सी. (मत्स्यशास्त्र) पदव्युत्तर अभ्यासक्रम डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2008-09 पासून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाव्यतिरिक्त सर्व कृषी विद्यापीठात दोन वर्षांचा एम.एस्सी. (उद्यान विद्या) पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झालेला आहे. यामध्ये भाजीपाला शास्त्र, फलोद्यान, पुष्पोत्पादन आणि बगीचा सुशोभीकरण या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे एम.एस्सी. (काढणीपश्‍चात व्यवस्थापन) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू आहे. तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे वनिकी या विषयाचा दोन वर्षांचा एम.एस्सी. (वानिकी) पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू आहे. 
महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथे विद्यापीठाचे महसुली उत्पन्नातून कृषी व्यवसाय व्यवस्थापन हा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम एम.बी.ए. (कृषी) सन 2008-09 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमासाठी 30 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) कृषी संलग्न शाखेचे बी.एस्सी. (कृषी व्यवसाय व्यवस्थापन), बी.एस्सी. (कृषी), बी.एस्सी. (उद्यानविद्या), बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी), बी.टेक. (अन्न तंत्रज्ञान), बी.एस्सी. (कृषी जैव तंत्रज्ञान), बी.एस्सी. (गृह विज्ञान), बी.एस्सी. (मत्स्य विज्ञान) आणि बी.एस्सी. (वनिकी) या शाखांचे पदवीधर पात्र समजले जातात. 

कृषी व्यवसाय व्यवस्थापन हा पदव्युत्तर अभ्यासक्रम मॅनेज हैदराबाद या संस्थेचे सहकार्याने तयार करण्यात आला आहे. तसेच देशामध्ये राबविण्यात येत असलेल्या तत्सम अभ्यासक्रमाचा विचार करून हा पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापक, पुणे येथील व्यवस्थापन संस्था आणि हैदराबाद, बंगलोर, अहमदाबाद, लखनौ इ. ठिकाणचे तत्सम अभ्यासक्रमातील तज्ज्ञ प्राध्यापक यांच्याकडून शिकविला जातो. तसेच एम.बी.ए. (कृषी) अभ्यासक्रम, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे अनुक्रमे 30 व 35 प्रवेश क्षमतेने सुरू केला आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष 2008-09 पासून सामाईक प्रवेश परीक्षेसाठी 70 टक्के वेटेज व 30 टक्के वेटेज पदवी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांना (सीजीपीए) देऊन पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो. 

पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशासाठीची सीईटी (सामाईक प्रवेश परीक्षा) महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र ज्ञान आयोग यांच्या सहकार्याने घेतली जाते. 

पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेशासाठीची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात घेतली जाते. सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत अकोला आणि नागपूर, मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत परभणी, बदनापूर आणि लातूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत धुळे, राहुरी, पुणे आणि कोल्हापूर तर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत दापोली या दहा केंद्रांवर घेतली जाते. या शैक्षणिक वर्षात सामाईक प्रवेश परीक्षा 7-7-2012 ते 12-7-2012 या कालावधीत घेतली जाणार आहे. 

निम्नस्तर कृषी शिक्षण 
कृषी विद्यापीठांमध्ये निम्नस्तर कृषी शिक्षणांतर्गत दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येतो. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक घटक कृषी तंत्र विद्यालय उपलब्ध असून या अभ्यासक्रमास दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला गुणानुक्रमानुसार प्रवेश दिला जातो. कृषी तंत्र विद्यालयाची प्रवेश क्षमता प्रत्येकी 60 इतकी आहे. याशिवाय महाराष्ट्रात खासगी कृषी तंत्र विद्यालये चारही कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत आठ घटक कृषी तंत्रविद्यालये, एक संलग्न कृषी तंत्र विद्यालय आणि 84 खासगी विनाअनुदानित कृषी तंत्र विद्यालये कार्यरत आहेत. 

सन 2007-08 पासून कृषी पदविका अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. तसेच कृषी पदविका अभ्यासक्रमाचे नामकरण 2007-08 पासून कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम असे करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आलेला आहे. यामध्ये यांत्रिकीकरण, जलसंधारण, व्यवसायाभिमुख शिक्षण या बाबींवर भर देण्यात आला आहे. 

कृषी पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रथम वर्षात कृषी मूलतत्त्वे, प्रमुख पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, फळे व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान, कृषी अवजारे, यंत्रे व आधुनिक सिंचन पद्धती, पीक संरक्षण, ग्रामीण समाजशास्त्र, कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. तर द्वितीय वर्षात सेंद्रिय शेती, बीजोत्पादन तंत्रज्ञान, रोपवाटिका व्यवस्थापन, फुलशेती व हरितगृह तंत्रज्ञान, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग, शेतीमाल प्रक्रिया, सहकार, पतपुरवठा व पणन या विषयांचा समावेश आहे. तसेच प्रथम व द्वितीय वर्षात अनुक्रमे कार्यानुभव व कृषी आधारित उद्योग कार्यानुभवाचा समावेश केलेला आहे. त्यामुळे या शिक्षणामधून उत्कृष्ट शेती करण्यासाठी, खते, बियाणे, औषधे यांच्या कारखानदारीसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार होणार आहे. तसेच स्वयंरोजगार निर्मितीसाठीचा आत्मविश्‍वास या कृषी पदवीधारकामध्ये निर्माण होईल.
 
कृषी पदविका अभ्यासक्रमाव्यतिरिक्त माळी प्रशिक्षण हा एक वर्षाचा कोर्स निम्नस्तर कृषी शिक्षणांतर्गत राबविला जातो. सातवी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे या कोर्ससाठी प्रवेश दिला जातो. माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम सध्या गणेशखिंड, पुणे, नारायणगाव, बारामती व प्रवरानगर येथे राबविला जातो. 

आचार्य अभ्यासक्रम  
महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांतर्गत आचार्य पदवी अभ्यासक्रम सुरू असून सध्या कृषी शाखेअंतर्गत एकूण 14 विषयांमध्ये आचार्य अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जात आहे. यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत शैक्षणिक वर्ष 2008-09 पासून पीक शरीरक्रिया शास्त्र, बियाणे तंत्रज्ञान, कृषी अणुजीवशास्त्र व जीवरसायन शास्त्र या विषयांमध्ये आचार्य पदवी सुरू करण्यात आलेली आहे. गृहविज्ञान या शाखेमध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत दोन विद्यार्थ्यांना, मत्स्यविज्ञान या शाखेमध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत पाच विद्यार्थ्यांना आचार्य अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येतो. 
महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत सन 2009-10 या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशक्षमता दीडपट करण्यात आली आहे. सध्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 364 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो व आचार्य पदवी अभ्यासक्रमासाठी 72 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठातून एकूण 1252 जागा पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता तर एकूण 180 जागा आचार्य पदवीकरिता उपलब्ध आहेत (तक्ता क्र. 1 व 2). 

कृषी पदवीधरांकरिता नोकरी/ व्यवसाय संधी  
कृषी व इतर संलग्न शाखांमधून पदवी/ पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता खासगी तसेच सरकारी क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यापीठाच्या "प्लेसमेंट सेल'मार्फत 2005 पासून आजतागायत सुमारे 1100 पेक्षा अधिक पदवीधरांची निरनिराळ्या खासगी क्षेत्रातील कंपन्या व बॅंकांमध्ये निवड झाली आहे. कृषी शाखेच्या पदवीधराकरिता कृषी विद्यापीठे, कृषी विभाग या सरकारी क्षेत्राव्यतिरिक्त अनेक खासगी बियाणे कंपन्या, बॅंका, कीटकनाशक कंपन्या, ठिबक तुषार सिंचन क्षेत्रातील कंपन्या इत्यादी ठिकाणी मागणी होत आहे. तसेच या पदवीधरांना स्वतःचा कृषी पूरक उद्योग उभारण्यास मोठा वाव आहे. कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये अनेक नामवंत कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. उद्यानविद्या पदवीधारकांसाठी अनेक पुष्पोत्पादन प्रकल्प, बीजोत्पादन, प्रक्रिया उद्योग, बॅंका इत्यादी ठिकाणी संधी उपलब्ध आहेत. विशेषतः अन्नशास्त्र व तंत्रज्ञान आणि कृषी जैवतंत्रज्ञान पदवीधारकाकरिता नवीन संधी वाढत आहे. अन्नशास्त्र तंत्रज्ञान आणि कृषी जैवतंत्रज्ञान पदवीधारकांकरिता नवीन संधी वाढत आहे. अन्नशास्त्र तंत्रज्ञान या पदवीधारकाकरिता फार मोठी संधी आहे. कृषी जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील पदवीधरांना विद्यापीठातील/ भाकृअप अंतर्गत संशोधन क्षेत्रात तसेच शैक्षणिक क्षेत्रात संधी उपलब्ध आहे. खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांना या तज्ज्ञ मनुष्यबळाची आवश्‍यकता भासणार राहील. तसेच परदेशामध्ये अनेक ठिकाणी पुढील शिक्षणाकरिता आचार्य पदवीसाठी शिष्यवृत्ती मिळण्याच्या संधी आहेत.